परमर्गा ची म्हातारी, महदंबा
महदाइसा ऊर्फ महदंबा ही महानुभाव पंथातील एक अग्रगण्य व्यक्ती होती. तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" असा तिचा गौरव झालेला होता. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा पंथीयांना मार्गदर्शक वाटत असे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त करून देतात.
श्री चक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशी विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली .
महदाइसेच्या काळात म्हणजे यादवकालात एकेश्वरी वादाचा पुरस्कार करणार्या पंथाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा उगम झाला. या पंथाचे पंचकृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण, श्री दत्तगुरू, श्री चक्रपाणी राऊळ, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायाची धुरा वाहिली. श्री चक्रधरस्वामी यांच्या काळात महानुभाव पंथाचा खर्या अर्थाने प्रसार झाला. महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या.
तत्कालीन समाजजीवनात स्त्रीच्या पातिव्रत्याच्या कल्पनेला विशेष महत्व होते. आपल्या स्त्रीवर नजर ठेवणारे पती, आवडती नावडती पत्नी असा भेदाभेद, विधवा व परित्यक्ता स्त्रियांची दयनीय अवस्था ह्या सर्व गोष्टी या दृष्टान्त पाठातून ठळकपणे दिसून येतात. स्त्री -जीवनाच्या अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर महदाइसा हिचे कर्तृत्व विशेष प्रकारे उठून दिसते.
महदाइसाचा जन्म एका विद्वान घराण्यात झाला. तिचे पणजोबा वामनाचार्य हे यादवराजांचे आश्रित असून पणजी महदाइसाही विद्वान होती. पणजीला म्हाळसा प्रसन्न होती, असे म्हणतात. पणजी महादेवरायाची पुरोहित असल्याने राजा तिला नित्य प्रश्न विचारीत असे व ती भविष्य सांगत असे. एका वादात तिने परप्रांतीय विद्वानांचा पराभव केल्याने तिला जैतपत्र मिळाले. राजाने पाच गावे इनाम म्हणून दिली. अशा विद्वान पणजीचा वारसा चालवणारी विद्वान नात महदाइसा होय. महदाइसाचा जन्म वायेनायक व कामाइसा ह्यांच्या पोटी झाला.
बालपणीच वैधव्य आलेली महदाइसा त्या काळच्या प्रथेनुसार माहेरी आली. माहेरी तिला प्रतिष्ठा असते. तिच्याच शब्दात सांगायचे झाल्यास ’माझ्या विना घरचे काहीच चालत ना, घरचे करणे सवरणे मीच करी! महदाइसाला चुलत बहीण भावंडेही होती. त्यातले नागदेव हे पुढे तिचे गुरू झाले. महदाइसेच्या व्यक्तिमत्वाचा शोध हा ’लीळाचरित्र’, ’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतिस्थळ’ व ’धवळे’ या चार ग्रंथांमधून घेता येतो. धवळेमध्ये तिची प्रतिमा दृष्टीस पडते. तीर्थयात्रेस जाणे, व्रतवैकल्य करणे, देवपूजेत रमणे या रुढ परमार्थाच्या वाटेने जाणे तिला आवडत असे. सुरुवातीच्या काळात श्रीचक्रधर स्वामींचे शिष्य दादोस हे तिचे गुरू होते. त्यांच्याकडूनच नागदेवाला व महदाइसाला श्री चक्रधरस्वामींचे मोठेपण कळाले. नागदेवाला श्रीचक्रधरस्वामींचे नांव कानी पडताच स्थिती प्राप्त होते (म्हणजेच दर्शन घडते); परंतु श्रीचक्रधरस्वामींचे दर्शन घडूनही महदाइसेने मात्र चटकन शिष्यत्व पत्करले नाही. तिच्या स्त्री मनाने जणूकाही गुरूची परीक्षा घेण्याचे ठरवले होते. आणि इथेच महदाइसच्या कर्तृत्वाचे, मोठेपणाचे व वेगळेपणाचे दर्शन घडते.
श्रीचक्रधरस्वामींनी आपल्या पंथात समानतेवर भर दिला. स्त्रियांना, शूद्रांना त्यांच्या पंथात प्रवेश होता. त्यामुळेच श्रीचक्रधरस्वामी हे आद्य कृतिशील सुधारक ठरतात. अशा स्वामींचे शिष्यत्व महदाइसेने विचारपूर्वक पारख करूनच स्वीकारले होते. महानुभाव पंथाचा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग तिने स्वईकारला होता. महदाइसेचे वडील याला विरोध करतात परंतु ती आपल्या ठाम निश्चयापासून दूर जात नाही.. महानुभावावे अत्यंत खडतर असलेले भिक्षाव्रत तिने स्वीकारले होते. या व्रतानुसार हाताच्या ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्वीविकारायचे व ते अन्न नदीच्या काठी जाउन, नदीकडे तोंड करुन प्राशन करायचे व पाणी प्यायचे. वैराग्यवृत्ती मनोनिग्रह या गुणांमुळेच ती हा खडतर प्रवास पार करू शकली. श्रीचक्रधर स्वामींवर तिची नितांत श्रद्धा होती.. त्यांच्या प्रत्येक विचाराला व तत्त्वज्ञानाला अनुसरणारी ती आदर्श शिष्या होती. श्रीचक्रधर स्वामींना आपले जीवन ती समर्पित करते. परंतु इथे हे समर्पण परमार्थाच्या भक्तीतून आले असल्याने त्याला अध्यात्माचा रंग चढला आहे.
स्वतंत्र वृत्ती, कुशाग्र बुद्धी असलेली महदाइसाबद्दल लीळाचरित्रात माहिती मिळते. श्रीचक्रधरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या लीलांचे वर्णन करण्यासाठी लीळाचरित्राची निर्मिती झाली . या लीलांमधे प्रामुख्याने श्रीचक्रधरस्वामींना जिज्ञासा व बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्न विचारून हैराण करणारी महादाइसा भेटते.’ म्हातात्री चचकः, म्हातारी जिज्ञासकः एथ निरंतर काहीतरी पुसतचि असे’ असे उदगार स्वामी तिच्याबद्दल काढतांना दिसतात, त्याच वेळी तिच्या विलक्षण बुद्धीची साक्ष पटते. दोघांच्या संवादांतून, प्रश्नोत्तरांतून पंथाची माहिती आपल्याला मिळत जाते. अशा महदाइसाशी संवाद साधताना श्रीचक्रधर परमार्गाला खुप सखोल ज्ञान देतात.
श्रीचक्रधरांचे तत्त्वज्ञान नीट समजून न घेतल्याने त्यांना अवयव विच्छेदनाची शिक्षा होते. पैठणचे विद्वान त्यांना पकडून घेउन जातात . आपल्या नंतर श्रीचक्रधर प्रभू पंथाची धुरा नागदेव व महदाइसा या दोघांच्या खांद्यावर देतात. महदाइसा आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या चिंतनात व पंथाच्या कार्यासाठी समर्पित करते. श्रीचक्रधर स्वामींच्या चिंतनाच्या याच काळात ’धवळ्या ’ची रचना झाली. धवळे, मातृकी, रुखमिनी सौयंवर, आरती अशी महदाईसाची वाङ्ममय निर्मिती आहे. श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या विवाह कथेकडे महदाइसा आकर्षित झाली होती.. रुक्मिणीच्या मनातील भक्तिभाव हा तिला विलक्षण वाटला. किंबहुना तिचे श्रीचक्रधरस्वामींशी असलेले गुरु- शिष्याचे नाते ती या धवळ्याद्वारा व्यक्त करताना दिसते. अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवराची कथा ही तिला आद्य कवियित्रीचा मान मिळवून देणारी ठरली. श्री चक्रधरांनी ७१ प्रसंगात श्रीकृष्णचरित्राचे वर्णन केले आहे. त्याचेच श्रवण मनन व चिंतन करून धवळ्याची निर्मिती झाली आहे. श्रीचक्रधर स्वामींचा वियोग तिला सहन झाला नाही. श्रीचक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशीच विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली .
श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करीत महदाइसा ही संन्यासिनी, धवळेकर्ती कवयित्री, प्रसंगी पंथात आईची भूमिका पार पाडणारी, ’कोण देहाते सांभाळी’ या अवस्थेला पोचणारी ज्ञानवान तपस्विनी होती. अखेरच्या काळात श्रीचक्रधरांच्या शिकवणुकीप्रमाणे शारीरिक व्याधी जडली असतांना देखील तिने औषधांना नकार दिला होता.. शेवटी नागदेवसुद्धा तिचे मोठेपण मान्य करतात.
नागदेव तिला विचारतात ’रुपै देव आठवतो’ ती म्हणते ’हो नागदेवा आठवतो’ नागदेव म्हणतात कैसा? ती म्हणते ’वजरी घडिता’ हे वजरी घडिता श्रीचक्रधरस्वामींचे रूप तिच्या ठायी चिरंतन वसलेले असते. ’रुपै देह’ पर्यंत उचित स्मरणा चुकवीशीः पहिल्या दिवसापासोनी सेवटील दिसापर्यंत देवो तुवाचि धरला असे’ अशी कबुली नागदेव देतात तेंव्हाच महदाइसेचे मोठेपण लक्षात येते.
स्त्री जीवनाचा खरा अर्थ दाखवून देणार्या काही स्त्रियांपैकी एक म्हणजेच महदाइसा म्हणजे महदंबा होय. तिचे जीवन एक मानबिंदू ठरतो. या पंथाने स्त्रियांना व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग मोकळा करून दिला. त्याचा महदाइसाने फायदा घेऊन परमोच्च स्थान प्राप्त केले. आजच्या कवितांमधून तिने पेरलेली काव्याची बीजे प्रतीत होतांना दिसतात.
🙏🏻दंडवत प्रणाम🙏🏻
परमार्गातील सर्वच महिला साधकांना जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्या. . . . . ..
अप्रतिम लेखन आणि संकलन
ReplyDelete✍️🙏🏾
Dandwat apratim 🌹🙏🌹🌹🌹🌹
ReplyDelete